सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी बरेच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अखेर लग्नगाठ बांधली आहे. २३ जून रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. सोनाक्षीच्या लग्नादरम्यान आणि लग्नानंतरही कुटुंबात तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या. वडील शत्रुघ्न सिन्हा व आई पूनम सिन्हा लेकीच्या लग्नाच्या या निर्णयावर खुश नव्हते, त्यामुळे भाऊ लव सिन्हाही लग्नाला उपस्थित राहिला नाही, अशी चर्चा सर्वत्र पसरली होती. आता यासंदर्भात शत्रुघ्न सिन्हा यांचे नवे वक्तव्य समोर आले आहे. (Shatrughan Sinha On Sonakshi Sinha Wedding)
‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आम्ही अनेक मोठी संकटे पाहिली आहेत. आणि त्यासमोर हे काहीच नाही”. दोन समाजातील फरकाबाबत ते म्हणाले, “त्यात नाराज होण्यासारखे काही नव्हते. आम्ही पण एका सामान्य कुटुंबासारखे होतो, जिथे लग्न होत होते”. सोनाक्षी व झहीरच्या लग्नाच्या विरोधात त्यांचा मुलगा लव सिन्हा असलेला दिसला. बहिणीचं लग्न न स्वीकारण्याबाबत वडिलांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “कौटुंबिक गोष्टी कुटुंबातच राहिल्या पाहिजेत. मी म्हटल्याप्रमाणे, कुटुंबात कोणाचे मतभेद नाहीत?. आम्ही काही मुद्द्यांवर असहमत असू शकतो वा वाद घालू शकतो. पण शेवटी आम्ही एक कुटुंब आहोत. आणि आमच्या कुटुंबाला कोणीही तोडू शकत नाही”.
ते पुढे म्हणाले, “आमच्याकडे इतके लक्ष का गेले, हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलेच माहित असेल. असा विवाह (आंतरधर्मीय) होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आमच्या कुटुंबाला प्रचाराच्या मोहिमेचा बळी ठरविण्यात आले. माझ्या कुटुंबावर होणारे हल्ले मी खपवून घेणार नाही, हे मी येथे स्पष्ट करतो”. एक वडील म्हणून ते आपल्या मुलीसाठी आनंदी आहेत आणि तिच्या आयुष्यातील निर्णयांना पाठिंबा देतो, असेही त्यांनी सांगितले. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “तिचा आनंद हाच आमचा आनंद. तिला आनंदी पाहून आम्हाला आनंद होतो. मला खात्री आहे की झहीर तिला आनंदी ठेवेल”.
सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी व झहीरने गेल्या महिन्यात लग्न केले. सोनाक्षीच्या राहत्या घरीच हा विवाहसोहळा पार पडला. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. सोनाक्षी व झहीर यांचे नोंदणी पद्धतीने साधेपणाने लग्न झाले. ज्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.