Zakir Hussain Last Post : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी १६ डिसेंबरला सकाळी सॅन फ्रान्सिस्को येथे अखेरचा श्वास घेतला. त्याच्या कुटुंबीयांनी या दुःखद बातमीला दुजोरा दिला. ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते आणि गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल होते. आता झाकीर हुसैन यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी एका अद्भुत क्षणाचा उल्लेख केला आहे. झाकीर हुसैन यांनी २९ ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ परदेशातील आहे. ते फिरायला गेले होते. त्यांनी शेरा केलेल्या व्हिडीओमध्ये वातावरण खूप आल्हाददायक झालेलं दिसत आहे. वारेही वाहू लागल्याने झाडांवर लाल पिवळी पाने फडफडताना दिसत आहेत. त्यांनी हा क्षण शेअर करत ‘सुंदर आणि अद्भुत’ असं म्हटलं.
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला. या वर्षी त्यांनी तीन ग्रॅमी पुरस्कारही जिंकले होते. झाकीर यांचे इंस्टाग्रामवर २९७K फॉलोअर्स आहेत. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय होते आणि ते त्यांच्या कामाशी व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्ट शेअर करत असत. त्यांनी आपल्या मुली आणि पत्नीसह अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.
त्यांनी त्यांची मॅनेजर अँटोनिया मिनेकोलाशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत. त्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले. शशी कपूर यांच्याबरोबरही काम केले, पण त्यांनी संगीतावर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. झाकीर हुसेन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठं आहे. झाकीर हुसैन यांच्या असामान्य प्रतिभेमुळे त्यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
झाकीर यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. लेखक व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने सूर पोरके होतात ऐकलं होतं, आज पहिल्यांदाच ताल अनाथ झाला असं वाटलं” असं म्हणत आपलं दुःख व्यक्त केलं आहे. तसंच गायिका वैशाली माडेने एका युगाचा अंत झाला असं म्हणत आपली भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसंच रवी जाधव यांनीही भावुक पोस्ट शेअर केली आहे. “एक उस्ताद ज्याने तालाला आत्मा दिला आणि प्रत्येक थाप अविस्मरणीय बनवली. त्यांची कलात्मकता जवळून अनुभवण्याचे भाग्य मला लाभले. तो क्षण मी कायम जपेन. जगाने एक रत्न गमावले आहे, परंतु त्याचा वारसा पिढ्यानपिढ्या प्रतिध्वनीत होईल. उस्तादजी, तुमची खूप आठवण येईल”.





