white Discharge problem : आजवर अशा अनेक महिला आहेत ज्यांना महिलांचे अनेक प्रॉब्लेम्स सतावत असतात. आजकाल अनेक महिला आहेत ज्या कामानिमित्त बाहेर असतात, अहोरात्र काम करतात यांत त्या त्यांच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. यादरम्यान त्यांची होणारी धावपळ, मेहनत यामुळे त्यांच्या शरीरावर बराच परिणामही जाणवतो. हल्ली महिलांच्या मासिक पाळी येण्याचे संतुलन बिघडले आहे अशा अनेक तक्रारी कानावर येतात. या सगळ्याला प्रदूषण, रोजची दगदग, बाहेरचे जंकफूड खाणे हे कारणीभूत ठरतात. आजकाल तर काही महिलांना मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी आणि नंतर पांढरा स्त्राव अंगावरुन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पांढऱ्या स्त्रावामुळे शरीर अशक्त होते. कधीकधी हा पांढरा स्त्राव इतका अधूनमधून येतो की, तो मासिक पाळीसारखा दिसतो. याला अनेकजणी घाबरुन जातात.
मात्र, या आजाराला अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही. वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने हा प्रॉब्लेम सोडवता येतो. जर याचे प्रमाण कमी असेल तर घरच्या घरीच घरगुती उपाय करुन हा आजार बरा होऊ शकतो. याबाबत डॉ. ऋचा मेहेंदळे पै यांनी जयंती वाघधरे या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली त्यावेळी त्यांनी महिलांच्या अंगावर पांढरा स्त्राव जाण्याच्या उपायांबाबत भाष्य केलं आहे. अंगावरुन जाणाऱ्या या पांढऱ्या स्रावाबाबत डॉक्टरांचे नेमके काय आहे म्हणणे आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. शिवाय यावर त्यांनी
घरगुती उपायही सांगितला.
डॉ. ऋचा म्हणाल्या, “पाळीच्या आधी आणि पाळीच्या नंतर जर व्हाईट डिस्चार्ज जात असेल तर, तो आपण नॉर्मल म्हणतो. पण काही मुलींमध्ये हे प्रमाण अधिक असते. आणि त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची अधिक शक्यता असते. त्यावेळेला आपण घाबरुन जातो, अशावेळी आपल्याला ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता आहे. याकडे दुर्लक्षित करुन चालणार नाही. नाहीतर त्यांना खूप विकनेस येतो. पाय दुखायला लागतात. पाठीत दुखू लागतं. त्यांना कळतच नसतं की नक्की काय होत आहे म्हणजे ते येऊन आम्हाला सांगतात की आम्हाला वाताचा त्रास आहे. प्रॉब्लेम झालाय का?, मग तेव्हा जेव्हा त्यांना विचारलं जातं, मी जेव्हा नाडी परीक्षा करते त्याच्यानंतर त्यांना विचारते की, नियमित तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होतोय का?. यावर त्या हो असं म्हणतात. अगदी रोज जातोय असं त्यांचं उत्तर असतं. तर हे चुकीचं आहे”.
पुढे उपाय सांगत त्या म्हणाल्या, “मग त्याला आपण उपाय म्हणून तांदळाचं जे धुवण असतं ते खूप उपयुक्त आहे. म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ धुतल्यानंतर त्याच्यावरील रोगजंतूनाशक वगैरे असेल ते नीट स्वच्छ धुतले गेले पाहिजेत. त्याच्यावर काही पावडर असेल ती निघून जायला हवी. रोज रात्री हे तांदूळ भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावर त्याच्यावर जे पाणी असतं ते त्यांनी घ्यायचं. याने देखील हा व्हाईट डिस्चार्ज थांबण्यासाठी उपयोग होतो”.





