Vaibhav Mangle In Hindi Language Compilation : हिंदी सक्तीचा वाद राज्यात पेटून आला आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होताच या वादाने उडी घेतली आहे. नवीन जीआरनुसार हिंदी सक्तीची नसली तरी पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गे हा वाद काही संपत नाही आहे. एकूणच याला राज्यभरातून विरोध दर्शविण्यात येत आहे. इतकंच नाही तर अनेक कलाकार मंडळींनीही या प्रकरणावर आवाज करत विरोध केला आहे. अशातच मराठी नाटक, सिनेमा, मालिकांमधून घराघरांत पोहोचलेले अभिनेते वैभव मांगले यांनी हिंदी सक्तीवर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी थेट पोस्ट शेअर केली आहे.
वैभव यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत, “उर्वरीत महाराष्ट्रचं मला माहीत नाही पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलाव लागतं हा एक भाग. दुसरं म्हणजे आपल्या आपल्यात सुद्धा त्यांना मराठी बोलायची लाज वाटते. आपली मुलं चांगल मराठी बोलायचं विसरुन गेली आहेत. त्यात हिंदीची सक्ती केली तर संपलच सगळं मातृभाषेची ( मुळात आई मराठी बोलत असले तर ) भिकारणीची अवस्था होईल. आता तर खेडोपाडी इंग्रजी शाळा झाल्या आहेत. मुंबई-पुणे येथे अनेक शाळामध्ये मराठी शिकवीत नाहीत”.
आणखी वाचा – “बाई नाचताना बघायला आवडते पण…”, हिंदवी पाटीलचा उल्लेख करत मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “या मुलीची…”
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “मुलांशी घरात इंग्रजी बोला सांगतात. आई- बाबांना धड इंग्रजी येत नाही. शाळेत शिक्षकांचं जे ऐकतील ते (शिक्षक तरी किती चांगलं बोलतील) त्यामुळे धड इंग्रजी नाही धड मराठी नाही. त्यात बोली भाषा वेगवेगळ्या , पुन्हा शाळेत प्रमाण भाषा शिका. त्याचा वेगळा ताप. आई खिमट म्हणते आणि शाळेत मऊभात म्हणा म्हणतात. मी उबारलायस म्हणतो शाळेत उभा राहिला आहेस म्हणतात. ‘माझ्या वांगडा चल’ म्हणतो तर शाळेत माझ्या बरोबर चल म्हणा म्हणतात”.
आणखी वाचा – एबीसीडी नाही तर थेट सारेगमप…; अर्जुनच्या लेकावरील संस्कारांचं कौतुक, पत्नीने व्हिडीओ शेअर करत दाखविली झलक
शेवटी वैभव यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “ही त्या बालमनाला संकट वाटतात. तर अजून हिंदी (राष्ट्रभाषा म्हणतात तिला )जोडीला आणून बसवली तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा. आपण आपल्या भाषेची कमालीची भीषण अवस्था केली आहे .तिच्या बद्दल कमालीचा अनादर आहे. आम्हाला तर सिरियलला स्क्रिप्ट सुद्धा मराठीत देत नाहीत (अनेक ठिकाणी ) तर इतर ठिकाणी जिथे हिंदी भाषिक इंग्रजाळलेले लोक आपली काय पत्रास ठेवतात ते आपण पाहतो आहोत. हिंदी पहिली पासून येईल न येईल हा माझ्यासाठीचा नंतरचा मुद्दा आहे, येणार ही नाही कदाचित पण म्हणून आपलं मराठी भाषेबद्दलच प्रेम वाढणार आहे का?. आपण आपल्या मुलांच मराठी चांगलं होण्यासाठी अधिक सजग होणार आहोत का?. मुळात आपण मराठीत बोलणार आहोत का ?”. वैभव यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना पाठिंबा देत हिंदी भाषा सक्तीला विरोध केला आहे.





