Tu maza Kinara Photo : बरेच दिवसांपासून अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री केतकी नारायणच्या ‘तू माझा किनारा’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. सुरुवातीला दिशाभूल करणारे काही फोटो शेअर करत चित्रपटाची उत्सुकता वाढविली, मात्र अखेर आता या सगळ्या चर्चांचे उत्तर प्रेक्षकांनी मिळाले. अशातच आता चित्रपटाचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये छोट्या मुलीच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. या कुटुंबामागचं खरं गूढ काय? पोस्टरमधील आई म्हणजेच केतकी नारायण आणि बाबा म्हणजेच भूषण प्रधान तर नाहीत?, असे अनेक प्रश्न पडले. ‘लायन हार्ट प्रॉडक्शन प्रा. लि.’ प्रस्तुत “तू माझा किनारा” या मराठी चित्रपटाचा पहिला अधिकृत पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची नवी लहर निर्माण केली आहे.
पोस्टरमध्ये दिसणारं केतकी, भूषण आणि केया यांचं हसतमुख क्षणचित्र पहिल्या नजरेला आनंदाचं वाटतं. पण त्या नजरेमागे नात्यांची एक वेगळी छटा दडलेली आहे, असं वाटत आहे. जी प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. “तू माझा किनारा” हा केवळ कुटुंबकेंद्री सिनेमा नाही, तर प्रत्येक घरात घडणाऱ्या भावनिक प्रवासाचा आरसा आहे.
आणखी वाचा – दोन्ही पायांना पोलिओ, दुःख -संकटांचा सामना आणि…; वीणा जामकरची सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची भावुक पोस्ट, म्हणाली…
या चित्रपटाची निर्मिती जॉइसी पॉल जॉय यांनी केली असून, सह-निर्माते सिबी जोसेफ आणि जॅकब जेव्हियर आहेत. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन क्रिस्टस स्टीफन यांचे असून, त्यांनी कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत संवेदनशीलतेने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. रूपांतरित पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन एल्धो आयझॅक यांचे असून, कथानकाला वास्तववादी स्पर्श देण्याचं मोठं काम त्यांच्या कॅमेऱ्याने केलं आहे. संकलन सुबोध नारकर यांनी केले असून अनिल केदार यांनी कला दिग्दर्शन केले आहे.
आणखी वाचा – राणी मुखर्जीला अधिक रोख रक्कम तर शाहरुख खानला कमी, राष्ट्रीय पुरस्कारावेळी असं का घडलं?, जाणून घ्या…
‘तू माझा किनारा’ हा भावनिक प्रवास ३१ ऑक्टोबर रोजी सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. चित्रपटात मुक्ताच्या भूमिकेत सुप्रसिद्ध इंस्टाग्राम स्टार केया इंगळे असून भूषण प्रधान आणि केतकी नारायण यांची पात्र अजून उलगडली गेली नाहीत. पोस्टर पाहून प्रेक्षकांना लगेच जाणवतं की हा चित्रपट केवळ एका कुटुंबाची कथा नाही, तर प्रत्येक घरातल्या नात्यांचा आरसा आहे. कधी आनंद, कधी ओझं, कधी हसू आणि कधी आसवं या सर्व भावनांचा किनारा प्रेक्षकांना या चित्रपटात सापडेल.





