marathi actress tharala tar mag : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. मालिकेने एक खास टप्पा गाठल्यानंतर स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर TTM मधील कलाकारांचे विविध व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. मालिकेतील कलाकारांनी या व्हिडीओद्वारे त्यांच्या तीन वर्षातील आठवणी सांगितल्या आहेत. यावेळी मालिकेतील कलाकारांनी पूर्णा आजी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची आठवण काढली. अभिनेत्री जुई गडकरी म्हणजेच सायली यावेळी खूप भावुक झाली. व्हिडीओद्वारे तिने यावेळी मनातील भावना व्यक्त केल्या.
जुई म्हणाली, “खूप असे किस्से आहेत, खूप असे दिवस होते, जे मी विसरु शकत नाही. पण यामधील सगळ्यात वाईट आठवण म्हणजे १६ ऑगस्ट २०२५ हा दिवस… हा दिवस आयुष्यात मी कधीच विसरणार नाही. कारण त्यादिवशी ज्योती ताई गेली. मला असं वाटतं की, तो दिवस नसता आला तर खूप बरं झालं असतं. कारण आम्हा सर्वांची तिच्याबरोबर खूप जास्त अटॅचमेंट होती, माझं आणि तिचं नातंही खूप वेगळं होतं. ती माझ्यासाठी खऱ्या आजीसारखी होती, ज्योती ताई माझी खूप चांगली मैत्रीण होती”.
आणखी वाचा – सूरजच्या लग्नात मिरवणं पडलं महागात, जान्हवी किल्लेकरची तब्येत बिघडली म्हणाली, “नजर…”
पुढे ती म्हणाली, “पूर्णा आजी आणि सायलीचे जे सीन व्हायचे त्यावरुन ऑनस्क्रीन सुद्धा तुम्हाला आमचं नातं कसं होतं हे दिसलं असेलच. ऑफस्क्रीन पण आमचं खूप छान एकमेकींशी नातं होतं, तिच्या जाण्याचा जो मला मॅसेज आला तो प्रसंग नाही आवडत. या 1000 एपिसोडच्या प्रवासातला तो दिवस जर पुसून टाकता आला असता किंवा तसं काही घडलं नसतं, तर बरं झालं असतं”.
शेवटी जुई म्हणाली, “आज 1000 भाग पूर्ण होत आहेत, हे बघायला ती हवी होती. त्यामुळे यानिमित्ताने जे काही छोटं-मोठं सेलिब्रेशन होईल, त्यात आम्ही तिला नक्की मिस करणार. कारण ती आमच्या मालिकेचा एक अविभाज्य घटक आहे. आजही आम्ही असं मानत नाही की, ती नाहीये. आम्हाला आजही असं वाटतं की, आजी आहे. तिचे आशीर्वाद नेहमी आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे तो एकच दिवस एक नकोशी आठवण आहे”.





