मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी अभिनयाव्यतिरिक्त उद्योग क्षेत्रातही आपलं नवीन पाऊल टाकलं आहे. आशातच दिवसांपूर्वी ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलने उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले. गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनघाने नवीन हॉटेल सुरू करणार असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. तिच्या या नवीन हॉटेलच्या व्यवसायानिमित्त तिला अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या होत्या. अशातच लोकप्रिय मराठी जोडी तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांनीही अनघाच्या ‘वदनी कवळ’ या नवीन हॉटेलला भेट दिली.
तितीक्षा-सिद्धार्थ हे पुण्यात नाटक बघायला गेले असताना नाटकानंतर या दोघांनी अनघा या त्यांच्या मैत्रिणीच्या हॉटेलला भेट दिली. तितीक्षाने आपल्या युट्यूब चॅनेलद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षा-सिद्धार्थ यांनी अनघाच्या हॉटेलमधील जेवणाचा छान आस्वाद घेतला. यावेळी अनघाने तिच्या हॉटेलमध्ये तितीक्षा-सिद्धार्थ यांनी स्वागत करण्याआधी त्यांना उखाणा घेण्याची अट घातली. तेव्हा सिद्धार्थने त्याच्या खास शैलीत एक उखाणा ही घेतला. त्याच्या या खास उखाण्याची झलकही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
यावेळी सिद्धार्थने उखाणा घेत असं म्हटलं की, “खूप भूक लागली म्हणून आलो बालगंधर्वजवळ, कुठे जायचं म्हणून काय विचारता?, आहे ना आपलं वदनी कवळ” असा खास उखाणा घेत तितीक्षा-सिद्धार्थ यांनी अनघाच्या या हॉटेलमध्ये प्रवेश केला. यानंतर या दोघांनी हॉटेलमधील स्वादिष्ट व रुचकर पदार्थांचा आस्वादही घेतला. जेवण झाल्यानंतर तितीक्षा-सिद्धार्थ यांनी आमरासवरदेखील खूप ताव मारला. यानंतर या दोघांनी आपल्या मैत्रिणीच्या हॉटेलचे तोंडभरुन कौतुकही केले.
दरम्यान, अभिनेत्री अनघा अतुल ही अभिनयक्षेत्राबरोबरच हॉटेलच्या व्यवसायात आल्यामुळे तिचे अनेक चाहत्यांसह कलाकारांनीही कौतुक केले होते. त्यामुळे आता ही अभिनेत्री पुन्हा पडद्यावर कधी पहायला मिळणार यासाठी तिचे अनेक चाहते उत्सुक आहेत आणि तितीक्षा-सिद्धार्थ यांच्याबद्दल बोलायचे झाले तर तितीक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, तर सिद्धार्थ लवकरच त्याच्या ‘जेएनयू’ या हिंदी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.