एखाद्या चित्रपटासाठी नायक जितका महत्त्वाचा असतो, तितकाच खलनायकही महत्त्वाचा असतो. खलनायकाशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकतो याची कल्पना करणंही हे दिग्दर्शक निर्मात्यांसाठी अवघड असते. त्याचबरोबर खलनायकाशिवाय चित्रपट बघणे हे प्रेक्षकांनादेखील न पटणारे आहे. त्यामुळे चित्रपटातील मुख्य कलाकारांना जेवढं प्रेम मिळतं, तेवढ्याच शिव्या चित्रपटातील खलनायकाला मिळतात. पण तरीही खलनायक हा चित्रपटासाठी महत्त्वाचाच असतो.
बॉलिवूडमधील अशाच काही खलनायकांपैकी एक लोकपिय खलनायक म्हणजे रणजीत बेदी. ज्येष्ठ अभिनेते रणजीत बेदी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित खलनायक म्हणून ओळखले जातात. स्वत:च्या जोरावर यश मिळवणाऱ्या या अभिनेत्याने ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशातच त्यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
यावेळी रणजीत यांनी त्यांच्या घरात बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींची पार्टी होत असल्याचे म्हटले. त्याबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “पूर्वी सूर्यास्त होताच दारु पिणे ही एक फॅशन होती. माझे तेव्हाचे अनेक मित्र हे दारू पित असत. धर्मेंद्र, अमिताभ हे रम प्यायचे. संजीव कुमार, शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर, विनोद खन्ना, राजेश खन्ना हे रात्रीचे माझ्या घरी दारू प्यायला येत असत. माझे आई-वडील तेव्हा दिल्लीमध्ये राहायचे आणि घरी नोकर-चाकर, दारु हे सगळंच असायचं. तर ते सगळे माझ्या घरी जमायचे.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मी कधी कधी शूटिंग संपवून घरी यायचो तर घरी सर्वांची मैफिल रंगलेली असयाची. तर तेव्हा रिना राय पराठे बनावट असायची. मौसमी मासे बनवत असायची. तर परवीन बॉबी सर्वांना दारु वाटत असायची. असं सगळं वातावरण माझ्या घरी असायचं. त्यामुळे मी एकेकाळी असा वेळ बघितला आहे, जिथे अमिताभपासून मिथुनपर्यंत तर फिरोज खानपासून जितेंद्रपर्यंतचे तेव्हाचे सगळे मोठे स्टार्स माझ्या घरी असायचे.”
दरम्यान, रणजीत यांनी पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारून सर्वांना इतके घाबरवले आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही त्यांची प्रतिमा अशीच बनली होती. मात्र, खऱ्या आयुष्यात रणजीत हे पूर्णपणे वेगळे आहेत. ते मांसाहारही करत नाहीत आणि दारूही पित नाहीत. याशिवाय त्यांचा स्वभावही खूप लाजाळू आहे.