कला क्षेत्रात काम करताना अनेक मराठी कलाकारांचा रंगभूमीवरचा व्यासंग हा दांडगा असतो. रंगभूमीवरचा वावर, देहबोली, अभिनय आणि यासाठीके चोख पाठांतर यासाठी मराठीतील अनेक कलाकारांची नावे आदराने घेतली जातात आणि यामध्ये अभिनेते शरद पोंक्षे यांचं नावही घेतले जाते. मात्र अशा कलाकाराकडून कधी तरी चूक होते आणि ज्याचे त्यांना खूप वाईट वाटतं. जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली होती आणि आता सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना या नाटकाची पर्वणी पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत आहेत. (Purush play Sharad Ponkshe blank)
या नाटकाच्या नुकत्याच पार पडलेल्या एका प्रयोगादरम्यान रसिकांना वेगळाच अनुभव आला. हा अनुभव म्हणजे नाटक रंगात आलं असताना एका प्रवेशानंतर अभिनेते शरद पोंक्षे अचानक सर्वकाही विसरले, स्तब्ध झाले आणि थांबले. श्रुती अगाशे या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रसिकप्रेक्षकांनी नाट्यगृह गच्च भरलेलं असताना मंचावर असलेले पोंक्षे सर्वकाही विसरून गेले. यावेळी ते म्हणाले की, “रसिकहो.. मी पुरता ब्लँक झालो आहे. मला काहीच आठवत नाही. मला जरा वेळ द्याल का?”. त्यावेळी सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांना संमती दिली. पुढे प्रयोग रद्द झाल्याचं घोषित केलं गेलं. पण प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन पोंक्षे पुन्हा मंचावर आले.
आतापर्यंतच्या त्यांच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असं झाल्यामुळे पोंक्षेंना यावेळी गहिवरून आलं होतं. पण प्रेक्षकांनी त्यांना थांबवलं आणि आतापर्यंतचा प्रयोग उत्तम झाल्याचं सांगत यापुढचे सगळे प्रयोग यशस्वी होतील अशा सदिच्छाही दिल्या. यावेळी प्रेक्षकांमध्ये नाराजी किंवा तक्रारीचा सूर जाणवला नाही. नाटकातील इतर कलाकारांनीही प्रेक्षकांचे आभार मानले. लेखिका आणि व्हॉइस ओव्हर कलाकार श्रुती आगाशेनं हाच अनुभव सांगणारा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे आणि यावर शरद पोंक्षेंना पाठिंबा दिल्याचेही पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ८० च्या दशकात गाजलेल्या या नाटकानं स्त्री- पुरुष समानतेवर भाष्य करताना, सामाजिक विषमता आणि स्त्रीच्या अस्मितेचं प्रतिबिंब संवेदनशीलपणे मांडलं होतं. त्यातील संवाद, पात्रांच्या भावना आणि विषयाच्या सखोलतेमुळे ते नाटक मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड ठरले. नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं ही कलाकृती पुन्हा सादर होत आहे.