सध्या सर्वत्र निवडणुकींचा माहोल सुरु असून राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकीत मतांचं पारडं जड व्हावं म्हणून अनेक लोकप्रिय व प्रसिद्ध चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारही आगामी निवडणुकींसाठी रिंगणात उतरत आहेत. नुकतीच बॉलिवूड अभिनेता गोविंदाला शिवसेनेच्या शिंदे गटातून निवडणुकीचे तिकीट देण्यात आले. अशातच आता गायक नंदेश उमपही लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचं पाहायला मिळत आहे.
गायक, संगीतकारनंतर आता नंदेश उमप त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहेत. नंदेश उमप हे मायावती यांच्या बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) कडून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. नंदेश उमप हे मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच विक्रोळी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याच मतदारसंघातून भाजपकडून मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार संजय दीना पाटील रिंगणात आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
निवडणूक अर्ज भरल्यानंतर नंदेश उमप यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘साम मराठी’शी साधलेल्या संवादात त्यांनी असं म्हटलं आहे की, “या क्षणी मला खूप छान वाटत आहे. आपणही समाजकार्य म्हणून काहीतरी केलं पाहिजे. आपणही निवणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे असं वाटत होतं. आणि आम्ही कलाकार म्हणून समाजप्रबोधनाचे काम करतच असतो, याच दृष्टीने आपणही काहीतरी वेगळी इनिंग खेळली पाहिजे या हेतूने मी या क्षेत्रात आलो आहे. सामाजिक जीवनात विविध अडचणी असतात. त्या प्रत्येक अडचणी पूर्ण होतातच असं नाही. त्याचा पाठपुरावा करता येतो का हे मी पाहणार आहे”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “कलाकारांच्याही काही समस्या असतात, त्यांच्यासाठी काही करता येईल का? हे मी यातून करणार आहे. कारण मी पण एक कलाकार आहे. माझी कलाकार म्हणून एक सामाजिक बांधिलकी आहे. मी आधीच्या सरकारमध्ये सांस्कृतिक खात्यात असताना अनेक कलाकारांना मानधन मिळवून देण्यासाठी, त्यांच्या समस्येसाठी भांडलो होतो. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत होतो आणि मी हे आता पण करणार आहे. म्हणजे मी आता राजकारणात आलो आहे किंवा निवडणुकीला उभा आहे म्हणून नाही तर मी निवडून आलो तरीही करणार आहे. त्यामुळे कलाकारांसाठी काही वेगळं काम करता येईल किंवा त्यांच्या काही समस्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.”