Tejaswini Pandit Raj Thackeray : मराठी-हिंदी भाषेमुळे राज ठाकरे सध्या चर्चेत असलेले पाहायला मिळत आहेत. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. तेव्हापासून ठाकरे बंधू चर्चेत असलेले पाहायला मिळाले. या आनंदात अनेक कलाकार मंडळीही सहभागी असलेले पाहायला मिळाले. अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शविला. दरम्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडित नेहमीच राज ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूने, राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ भाष्य करताना दिसतात. जल्लोष मेळाव्यातही ती सहभागी झाली होती. इतकंच नाहीतर राज ठाकरे यांच्या बद्दलच्या भावना ती नेहमीच सोशल मीडियावरुन शेअर करताना दिसते.
तेजस्विनीने मराठी भाषा मुद्द्यावरुन राज यांना पाठिंबा दिला. यानंतर आता अभिनेत्रीने ‘अजब गजब’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्याबाबत भाष्य केलं. अभिनेत्रीचं हे भाष्य सध्या चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. या मुलाखतीत तेजस्विनीला ‘राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…’, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देत तेजस्विनी म्हणाली, “ते मुख्यमंत्री झाले तर आपला महाराष्ट्र खूप भारी असेल, त्यांचं व्हिजन खूप छान आहे. मी त्यांच्याशी वैयक्तिकपणे अनेकदा बोलली आहे आणि त्यांच्या बोलण्यातूनच जाणवतं की, तो माणूस महाराष्ट्राला अगदी वरचं स्थान देतो, स्वतःच्या कुटुंबापेक्षाही जास्त. मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे”.
पुढे ती म्हणाली, “असे खूप कमी राजकारणी आहेत. ज्यांचं बोलणं मला खूप आवडतं. नितीन गडकरी, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे ही किती छान भाषणे करायची. शरद पवार सुद्धा. मला कधी कधी वाटतं, त्यांच्या मेंदूचं संशोधन केलं पाहिजे. इतके बुद्धीवान राजकारणी आहेत. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरेंमध्ये जे आहे ते त्यांच्याकडूनच येतं. राज साहेब बोलतात तेव्हा असं वाटतं की, ते बाळासाहेबांच्या मुखातूनच आलं आहे की काय असं वाटतं”.
शेवटी तेजस्विनी म्हणाली, “पुर्वीची राजकारणी माणसं खूप वेगळी होती आणि तेव्हाचं राजकारणसुद्धा खूप वेगळं होतं. पुर्वीच्या राजकारणात नैतिकता होती, पॉवर होती. जे आता दिसत नाही. आता चित्र थोडंसं बिघडल्यासारखं वाटतं”.





