आपल्या बिनधास्त व बेधडक व्यक्तव्यांनी कायमच चर्चेत राहणारी मराठी अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे. आजवर अनेक राजकीय व सामाजिक प्रश्नांवर अभिनेत्री आपली भूमिका मांडत असते. अशातच सध्या राज्यभरात चर्चेत असलेली एक घटना म्हणजे पुणे कार अपघात. पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री भरधाव आलिशान कारच्या धडकेनं दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अटक केलेल्या आरोपीला अवघ्या बारा तासांत जामीन मिळाला. यावर समाजमाध्यमांमधून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि यावर केतकीनेही तिची भूमिका स्पष्ट केली आहे.
या प्रकरणी केतकीने तिचा संताप व्यक्त करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “रात्री अडीचच्या सुमारास वेदांत अग्रवाल पबमधून निघाला आणि ३ च्या सुमारास हा अपघात झाला. यामध्यी अश्विनी व अनिश यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मृत व्यक्तींचे मित्रमैत्रीण पोलिस ठाण्यात गेले असताना त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्यात आलेआणि त्यांनाच जाब विचारण्यात आला. या सगळ्या प्रकरणात त्याला वाचवण्यासाठी पोलिसांकडून मदत करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले असल्यामुळे पोलिसांचा हा प्रयत्न फसला.”
यापुढे अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिला अटक झाली होती. तेव्हा पोलिसांनी तिला कशी वागणूक दिली होती?, तिच्याबरोबरचे पोलिसांचे वागणे कसे होते? आणि आता या गंभीर प्रकरणातल्या आरोपीलाही कशी वेगळी वागणूक मिळत आहे? याबद्दल तिनं संताप व्यक्त केला आहे. याबद्दल केतकीने असं म्हटलं आहे की, “या वेदांतला रात्री बर्गर खाण्याची इच्छा झाली, म्हणून रात्री साडेतीन वाजता पोलिस बर्गर शोधण्यासाठी निघाले. पण आमच्यासारख्या सामान्य लोकांना उपाशी ठेवलं जातं.”
यापुढे तिने असं म्हटलं की, “पोलिस ठाण्यापासून एक किलोमीटरवर वडापावचं दुकान नाही. त्यामुळे आम्हाला तुझ्यासाठी काही खायला आणता येणार नाही असं सांगूनमला साडे सोळा तास उपाशी ठेवण्यात आले होते. पोलिस माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला उपाशी ठेवतात. पण या लाडवलेल्या बाळाला लगेच बर्गर आणून दिला जातो आणि तो मुलगा तिथे बसून ते खातही आहे. त्याचे हे सगळे लाड पुरवलेही जात आहेत.”
यापुढे केतकीने या सगळ्या प्रकरणी तिचा राग व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांनी कारवाईत केलेल्या हलगर्जीपणाबद्दलही तिचा संताप व्यक्त केला आहे. तसेच तिने न्यायालयीन कारवाईबाबतही अनेक गंभीर आरोप व्यक्त करत या सर्व प्रकरणी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा न्याय दिला जातो असंही म्हटलं आहे. सामान्य लोकांसाठी शासन वेगळे आहे आणि श्रीमंत लोकांसाठीचे शासन वेगळे असल्याचे तिने या व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.