‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल यांच्या ‘आठवी अ’ या सीरिजने मनोरंजन विश्वात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे सांगण्यात आली आहे.
या सीरिजचे आतापर्यंत एकवीस भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या सीरिजच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे. ही सीरिज प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. या सीरजमध्ये येणाऱ्या अनेक ट्विस्ट्स व रंजक वळणांमुळे या सीरिजविषयी जाणून घेण्यात प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. प्रेक्षकांच्या याच उत्सुकतेत आणखी भर घालण्यासाठी या सीरिजचं पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शाळेची सहल गेली असल्याचे कथानक सध्या सुरु आहे आणि याच सहलीवर एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन वाऱ्यासंग झुलतया’ असं या गाण्याचं नाव असून गायक सार्थक शिंदे व गायिका अनुजा पांचाळ यांनी हे गाणं गायलं आहे. समीर पठाण यांनी या गाण्याचे गीतलेखन केले आहे. तर या गाण्याला चाल संगीतकार मंदार पाटील यांनी दिली आहे.
‘मन वाऱ्यासंग झुलतया’ या गाण्यात आभ्या व त्याच्या मित्रांची धमाल मजा व मस्ती पाहायला मिळत असून या सहलीच्या गाण्याबरोबरच रसिकांना लालपरीतून गावखेड्याचे निसर्गसौंदर्यही अनुभवायला मिळणार आहे. या गाण्यातून प्रत्येकाच्या शाळेतील काही जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. ‘आठवी-अ’ या सिरिजप्रमाणेच ‘मन वाऱ्यासंग झुलतया’ हे नवीन गाणंही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल यात काहीच शंका नाही.
आणखी वाचा – “नुकतीच माझी आई गेली…”, सविता मालपेकरांच्या आईचं निधन, तरीही शूट करत आहेत अन्…; म्हणाल्या, “दुःख आहेच पण…”
‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनेलवर हे नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दरम्यान, ‘आठवी-अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली आहे. त्याचबरोबर अनंत श्रीवास्तवा व जैमिन शिगवण हे या सीरिजचे प्रोजेक्ट प्रमुख आहेत. तर क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे असून फायनान्सचा पदभार विशाल मेनारिया यांनी स्वीकारला आहे.