Monika Dabade Surname : लग्नानंतर नाव आणि आडनाव बदलणे आता खूप प्रमाणात कमी झालं आहे. खरं तर आजकाल दोन आडनाव लावतात. ही नवीन प्रथा सुरु झाली आहे. पण तरीही अनेक मुली लग्नानंतर आपलं माहेरचं आडनांव लावणंच पसंत करतात. आपल्या आई-वडिलांची आठवण म्हणून त्यांना आपल्या माहेरचे आडनांव लागायचे असते. अर्थात बरेचदा आजकाल मुलंही मुलींच्या या म्हणण्याला पाठिंबा देतात. आडनांव न बदलण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कलाकार. अनेक कलाकार मंडळी आहेत जी लग्नानंतर त्यांच्या माहेरचंच आडनांव लागतात, आणि अर्थात असे करण्यामागे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आडनांव न बदलण्यावरुन भाष्य केलं आहे.
‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे. मोनिका लग्नाच्या १० वर्षांनीही तिच्या वडिलांकडचंच नाव लावते. मोनिकाच सासरचं आडनांव कुलकर्णी असं आहे. आडनांव न बदलण्याबाबत मोनिकाने ‘इट्स मज्जा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. हा इंटरव्ह्यू जेव्हा जाईल तेव्हा या इंटरव्ह्यू खालीदेखील पहिली कमेंट हीच असेल की आजकालच्या मुलींना जुन्या पद्धती स्वीकारायच्या नाही आहेत. यावर पहिलं वाक्य माझं असं असेल की, माझ्या बाबांचं आडनावं आहे दबडे. आणि मी त्यांचं आडनांवच लावणार कारण त्यांनी मला ही दिलेली ओळख आहे. चिन्मय माझा नवरा आहे ही माझी वेगळी ओळख आहे. पण माझ्या व्यावसायिक कारकिर्दीत मी जी काही उभी झाले आहे ती ओळख मला माझ्या वडिलांपासून मिळाली आहे”.
पुढे तिने म्हटलं, “माझ्या विचारातून मी तयार झाले आहे. ती ओळख मी सोडू शकत नाही आणि त्यामुळे मी माझ्या वडिलांचंच नाव लावणार. माझ्या वडिलांनी मला मोठं केलं, त्यांनी मला घडवलं, त्यांनी माझं शिक्षण केलं आणि आता मी नवऱ्याच्या घरी जाऊन त्याचं नाव लावणं मला योग्य वाटत नाही. त्याच्यासाठी माझी मुलगी आहे. तिला चिन्मयचंच आडनांव लागणार आहे. आम्ही एकत्रच राहतो, आम्ही वेगळे झालेले नाही आहोत. माझ्या वडिलांकडून मला मिळालेली ओळख मला माझ्या शेवट्पर्यंत वापरायची आहे. हे माझं प्रांजळ मत आहे”.
शेवटी मोनिका म्हणाली, “माझ्या वडिलांनी मला जे दिलं आहे ते मी विसरु शकत नाही. मी आजही माझ्या कोणत्याच कागदपत्रावर माझं नाव बदललेलं नाही आणि मी ते करणार पण नाही आहे. आणि याबाबत चिन्मयचाही विरोध नव्हता”.





