सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक कलाकार मंडळींच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. त्यानिमित्ताने अनेकजण एकमेकांच्या घरी त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेत आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजू मानेंच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले असून त्यांनी एक पोस्ट करत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. (CM Eknath Shinde visits Director Viju Mane Home)
सोशल मीडियाच्या माध्यमातून विजू माने नेहमीच विविध मुद्द्यांवर अनेकदा व्यक्त होत असतात. विजू माने यांच्या घरी दरवर्षी गणरायाचे आगमन होत आहे. एकनाथ शिंदे हे दरवर्षी बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी जातात. यावर्षीही मुख्यमंत्र्यांनी विजू मानेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेत त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबियांबरोबरचा एक फोटो त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला.
हा फोटो शेअर करत ते म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेली २० वर्ष (कोरोनामधील दोन वर्षे वगळता) आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला येण्याचा शिरस्ता यावर्षीही मोडला नाही. आभार मानून अपमान करणार नाही, परंतु त्यांच्या या वृत्तीचं कौतुक केलं पाहिजे. एक आमदार असताना, मग मंत्री झाल्यावर आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी ते आमच्या घरी आले. मी, शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने सर्वसामान्य माणसाला भेटीगाठी दिल्याचे अनेक किस्से ऐकले. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही मला आलेली प्रचिती आहे.”
हे देखील वाचा – “परवा पर्यंत रागंत होती मग…”, ‘आई कुठे काय करते’मधील छोट्या जानकीसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले, “कोणाला कळलंच नाही की…”
पुढे ते म्हणतात, “राजकारण आपल्या जागी असेल परंतु माझ्या मते याला समाजकारण म्हणावं. थेट संपर्कातून, संवादातून समाजभान जपण्याचं हे द्योतक आहे. केवळ माझ्या घरी आले, म्हणून मी हे सांगत आहे असं नाही. आमच्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये शिरता शिरता तिथल्या एका व्यक्तीने त्यांना विनंती केली की, माझ्या घरी गणपतीला याल का? मला माहिती होतं की, साहेबांची तब्येत बरी नाही. त्यांना थ्रोट इन्फेक्शन, ताप आला आहे. मात्र तरीही त्यांनी त्या व्यक्तीची विनंती स्वीकारत ते मला घेऊन त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्याही घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.”
“धर्मवीर आनंद दिघे यांचा सर्वसामान्यांमध्ये असलेला करिष्मा त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामध्ये होता. यात गणेशोत्सवाला सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे. दिवस-रात्र गणेशोत्सव मंडळ आणि जी कोणी व्यक्ती आमंत्रित करेल त्या व्यक्तीच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेणे, हा पायंडा त्यांनी पाडला होता. त्याच पावलांवर पाऊल ठेवत आपली सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटणार नाही, याची काळजी मुख्यमंत्री घेत आहेत हे निश्चितच भूषणावह आहे.”, असे विजू माने या पोस्टमध्ये म्हणाले.
हे देखील वाचा – Video : बाप्पाला निरोप देताना रडू लागली मायरा वायकुळ, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
त्यांची ही पोस्ट व्हायरल होत असून शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. विजू माने यांनी ‘पांडू’सह अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याबरोबरच त्यांची ‘स्ट्रगलर साला’ ही वेबसीरिज प्रचंड लोकप्रिय ठरली. नुकताच याचा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.