छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोने आजपर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नाही तर या शोने जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवले. या कार्यक्रमाने भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, योगेश शिरसाट, रोहित चव्हाण, स्नेहल शिदम यांसारख्या अनेक विनोदवीरांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. एकेकाळी हा शो लोकप्रियेतच्या शिखरावर होता. सर्वत्र खऱ्या अर्थाने याच शोची हवा होती.
मध्यंतरी ‘चला हवा येऊ द्या’ प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं होतं. मात्र काही कारणांमुळे हा कार्यक्रम पुन्हा सूरू करण्यात आला. मात्र आता अखेर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या या शोला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष भाग सुरु आहेत. त्यानंतर आता हा शो ऑफ एअर जाणार आहे. म्हणजेच हा शो बंद होणार असून ‘चला हवा येऊ द्या’ऐवजी काही नवीन मालिका सुरु होणार आहेत.
काही दिवसांपूर्वी सागरने या शोमधून निरोप घेतला. त्यानंतर नुकताच या शोमधून डॉ. निलेश साबळेनेही शो सोडल्याची घोषणा केली. तब्येतीच्या कारणास्तव त्याने हा शो सोडल्याचे सांगितले. कुशलनेही हिंदी शोमध्ये एन्ट्री घेतल्यामुळे त्याने हा शो सोडला असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. अशातच श्रेया बुगडे व अंकुर वाढवे या कलाकारांनीदेखील या शोनिमित्त काही खास आठवणी शेअर केल्या आहेत.
झी मराठीवर लवकरच दोन नवीन मालिका प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. १८ मार्चपासून रात्री ९.३० ला ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका दाखवली जाणार आहे. तर १०.०० वाजता ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, हा शो कायमचा बंद झाला आहे की, या शोने काही दिवसांपुरता ब्रेक घेतला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ या शोचा पहिला भाग १८ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसारीत झाला होता. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ‘चला हवा येऊ द्या’ने आपला वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. मात्र, आता हा कार्यक्रम बंद होत असल्याने चाहते नाराज झाले आहेत.