करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन अभिनित ‘क्रू’ हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली पाहायला मिळाली. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रसारित करण्यात आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर आता अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी भाष्य केलं आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली असून या चित्रपटाची कथा ‘अर्थहीन’ असल्याचे म्हटले आहे. मात्र, चित्रपटातील तीनही कलाकारांच्या बॉन्डिंगचे त्यांनी कौतुक केले. (sharmila tagore on kareena kapoor)
करीना कपूर म्हणाली की, ‘क्रू’ चित्रपटाने केवळ लोकांचे मनोरंजन केले नाही. पण बॉक्स ऑफिसवरही तो यशस्वी ठरला. या चित्रपटामुळे आता महिला कलाकारांसाठीही चांगले चित्रपट व भूमिकांसाठी जागा निर्माण होणार आहे. याशिवाय चित्रपट निर्मातेही महिलांवर आधारित आणि केंद्रस्थानी चित्रपट बनवतील. २९ मार्च रोजी चित्रपटगृहात दाखल होणारा हा चित्रपट एअरलाइन्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कथा सांगतो.
शर्मिला टागोर यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अलीकडच्या चित्रपटांच्या प्रगतीबद्दल आणि स्त्रियांना पडद्यावर ज्या प्रकारे सादर केले जाते याबद्दल त्या बोलल्या आहेत. त्यांनी क्रू या चित्रपटाचे उदाहरण दिले. “अर्थात हे मूर्खपणाचे आहे”, असं त्या म्हणाल्या. हे विश्वासापलीकडचे आहे पण त्यात तीन स्त्रिया आहेत, ज्यांच्यामुळे कथा पुढे जात आहेत. तिघेही मिळून सर्व प्रकारची कामे करत आहेत. आणि तिघींमध्ये एक चांगला आणि अद्भुत बंध आहे. कारण एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची सर्वात मोठी शत्रू असते असे म्हणतात. पण इथे तसे नाही आहे.
करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती आता रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहात येणार होता पण पोस्ट प्रॉडक्शनच्या कामामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.