Ankita Walavalkar On Vaishnavi Hagawane : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण अद्याप काही निवळलेलं नाही. सासरच्या जाचाला कंटाळून वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी आणि ११ महिन्याच्या बाळाला पाठी सोडून वैष्णवीने टोकाचं पाऊल उचललं. वैष्णवी हगवणेने घरीच आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. यादरम्यान, संपूर्ण हगवणे कुटुंबाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आणि त्यांची कसून चौकशीही सुरु आहे. तर वैष्णवीच्या बाळाची जबाबदारी आता तिच्या आई-वडिलांकडे म्हणजे कस्पटे कुटुंबाकडे सोपविण्यात आली आहे. या प्रकरणावरून अनेक कलाकार मंडळींनी आणि राजकीय मंडळींनी आवाज उठविला. दरम्यान, वैष्णवीच्या या घटनेनंतर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर हिनेदेखील एक व्हिडीओ शेअर करत तिच्याबरोबरही असंच काहीस घडलं होतं असा खुलासा केला.
अंकिताने तिच्या ब्लॉगमध्ये असं म्हटलं की, “वैष्णवी हगवणे प्रकरणात काहींना वाटलं ती चुकली, काहींना वाटलं तिचे आई-वडील चुकले तर काहींना वाटलं तिच्या सासरचे चुकले. बरेचजण तर आता तिच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवत आहेत. पण तुम्ही हा विचार केलात का की त्या मुलीला तेव्हा काय वाटलं असेल. जीव द्यायला सुद्धा हिंमत लागते. ती हिंमत जर त्या मुलीमध्ये असेल तर त्या मुलीची चारही बाजूने कोंडी झालेली असते. मुलींच्या बाबतीत असं काही झालं तर मला खूप चिड येते. कारण मी सुद्धा यामधून गेले आहे. त्या मुलीने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला पण तरीही तिला कोणी सिरीयसली घेतलं नाही. तिला फक्त तिने आपल्याला घाबरवलं की, काही करुच शकत नाही असं दाखवलं त्यामुळे ती आणखी या टोकाच्या पावलापर्यंत गेली”.
पुढे ती म्हणाली, “एखादा श्रीमंत मुलगा असेल तर श्रीमंती बघून लग्न केलं असे टोमणे मारले जातात. मुलीचा आवाज दाबला जातो. मी जेव्हा स्वतः माझ्याबद्दल लोकांना सांगितलं तेव्हा कमेंट सेक्शनमध्ये मला ट्रोल केलं. मी एका मोठ्या शोमध्ये माझ्याबद्दल सांगितलं तिथेही तसंच झालं. मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी त्या गोष्टी फाट्यावर मारुन पुढे आले आहे त्यामुळे कुठे माझं भलं झालं आहे. ते सुद्धा करताना समाजाने मला जी वागणूक दिली ती तुम्ही बघितली आहे का? हा प्रकार झेलण्याची सगळ्यांचीच कुवत नसते ती नशिबाने देवाने मला दिली. त्यामुळेच मी हे सगळं पार करु शकले नाही तर या वैष्णवी हगवणेच्या जागी एखादी अंकिता दिसली असती जिने जीव दिला असता. या सगळ्याला कारणीभूत आपला समाज असतो जो प्रत्येक वेळी त्या मुलीला, तिच्या कपड्यांना, तिच्या कुटुंबाला जज करत असतो”.
आणखी वाचा – “काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…
अंकिता वालावलकर एक किस्सा सांगत पुढे म्हणाली, “बऱ्याच जणांनी असं सुद्धा म्हटलं आहे की, वैष्णवीला तिच्या आई-वडिलांनी पुन्हा तिथे का पाठवलं. चूक तिच्या आई-वडिलांचीच आहे. याबाबत सुद्धा माझ्यावरुन एक किस्सा मी शेअर करते. एकदा एक काका आमच्या घरी आलेले आणि ते म्हणालेले की आज काल तुमची मुलगी इकडेच असते. तेव्हा माझी आई वाघिणीसारखी त्या माणसावर बरसलेली. तुम्हाला जड झाली आहे का मुलगी? मला माझी मुलगी जड झालेली नाही मी माझ्या मुलीचं भविष्य पाहू शकते. तुम्ही काळजी करु नका. सांगायचा अर्थ हा की समाजाकडून आई-वडिलांना असं बोललं जातं आणि याच भीतीपोटी आई-वडील आपल्या मुलांना सपोर्ट करत नाहीत. आज ही अंकिता तुम्हाला इथे बसून काहीतरी करताना दिसते तर यामागे माझ्या आईने मला जो काही पाठिंबा दिला तोच आहे”.