कलाक्षेत्रात काम करत असताना आर्थिक स्थिरता हा मुद्दा कायमच वर डोकावू पाहतो. कलाकारांकडूनही याबाबत अनेकदा भाष्य केलं जातं. इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कधी हाती कामच नसतं. काम असलं तर स्वतःला वेळही देता येत नाही अशी परिस्थिती असते. पण कलाकारांच्या हाती काम नसेल तर पडत्या काळाला तितक्याच हिंमतीने मात द्यावी लागते. बऱ्याचदा कलाकारांच्या मानधनाविषयी विविध चर्चा रंगताना दिसतात. काही कलाकारांचं दिवसाचं मानधन लाखांमध्ये असतं असं बोललं जातं. मात्र प्रत्यक्षात काही वेगळंच चित्र असल्याचं काही कलाकारांचं म्हणणं आहे. भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचियाने त्यांच्या पॉडकास्टमध्ये याविषयी भाष्य केलं. (Bharti singh Harsh limbachiya)
हर्ष व भारतीच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री रिम शेखने हजेरी लावली होती. यावेळी सध्याची टेलिव्हीजन विश्वातील परिस्थिती याबाबत अनेक चर्चा रंगल्या. यावेळी टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये ‘लाफ्टर शेफ’ सारखे मोठ शो खूप कमी प्रमाणत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत असं हर्षचं म्हणणं आहे. त्याचबरोबरीने आधीच्या तुलनेपेक्षा आता टेलिव्हीजनमध्ये खूप कमी पैसे मिळतात असंही हर्षने सांगितलं.
हर्ष व भारती स्वतः लोन काढून काम करत असल्याचा खुलासा त्यांनी केला. हर्ष म्हणाला, “आम्हीही काही गंभीर समस्यांचा सामना करत आहोत. मी एका चॅनलवर शो होस्ट करत असतो. तर भारती दुसऱ्या एका चॅनलच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळते. त्यामुळे लोकांना असं वाटतं की, आम्ही खूप पैसे कमावते. भारती दिवसाला ५० लाख तर मी दिवसाला २० लाख रुपये कमावत असल्याचा लोकांचा समज आहे”.
पुढे हर्ष म्हणाला, “आमची कमाई मोठी आहे असं सांगितलं जातं. पण तसं प्रत्यक्षात काहीच नाही. आम्ही कर्ज काढून जीवन जगत आहोत. आमच्याजवळ आलेलं काम जर आम्ही केलं नाही तर ते कोणीतरी दुसरं करणार एवढं नक्की”. यावर भारती मजेत म्हणाली की, “सकाळी दूधवाला जरी आला तरी आम्हाला असं वाटतं की, कोणीतरी कर्ज वसूल करणारा दारात आला आहे”. सध्या भारती ‘लाफ्टर शेफ २’चं सुत्रसंचालन करत आहे.