‘बिग बी’ अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा ५१वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी बॉलिवूडच्या या पॉवर कपलवर शुभेच्छांचा वर्षावही केला. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमिताभ व जया यांचा लाडका मुलगा आणि सून अभिषेक-ऐश्वर्याने त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. यावरुन पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे की, बच्चन कुटुंबात पुन्हा संकट आलं आहे. तीन जून रोजी बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांच्या लग्नाला ५१ वर्षे पूर्ण झाली. मात्र, यावेळी बिग बींचा हा दिवस तितकासा खास नव्हता. (Amitabh Jaya Bachchan Wedding Anniversary)
खरं तर, दरवर्षी या जोडप्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी म्हणजेच जलसावर कार्यक्रम आयोजित केला जात होता. या खास प्रसंगी बिग बी त्यांच्या लग्नाशी संबंधित एखादा फोटो शेअर करायचे किंवा चाहत्यांना त्यांच्या लग्नाबाबतच्या आठवणी सांगायचे. पण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही पोस्ट शेअर न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकंच नाही तर अभिषेक बच्चन त्याच्या आई-वडिलांना दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छाही देत असे. तो सोशल मीडियावर आपल्या आई-वडिलांचे फोटोही शेअर करत असे. मात्र यावेळी अभिषेक बच्चनचे सोशल मीडिया अकाउंटवरही काहीही शेअर केले नाही.
अमिताभ व जया यांची सून ऐश्वर्याने २०१८ साली सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एकदा शुभेच्छा दिल्या होत्या. त्यादरम्यान ऐश्वर्याने तिची मुलगी आराध्याचा अमिताभ व जयाबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि तिच्या सासू आणि सासऱ्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ऐश्वर्या नेहमीच तिचे सासरे अमिताभ बच्चन यांना तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते, तर ती तिच्या सासरच्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाही. यावरुन या अभिनेत्रीचे सासू जया बच्चन यांच्याबरोबरचे संबंध चांगले नसल्याचे दिसून येत आहे. ऐश्वर्या तिच्या पालकांच्या वाढदिवसाला निश्चितपणे पोस्ट करत असते. तर याउलट ती तिच्या सोशल अकाउंटवर तिच्या सासरची छायाचित्रे पोस्ट करत नाही.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबात सतत मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. अलीकडे लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यानही बच्चन कुटुंब एकमेकांपासून लांब राहिले. ऐश्वर्या तिला दुखापत झालेला हात घेऊन एकटीच मतदानासाठी आली होती. तिचा पती अभिषेकही तिच्याबरोबर दिसला नाही.
याआधी बच्चन परिवार नेहमी एकत्र येऊन मतदान करत असे. कान्स फेस्टिव्हल २०२४ मध्ये ऐश्वर्या मुलगी आराध्याबरोबरही दिसली होती. यावरुन ऐश्वर्या व अभिषेकचे लग्न मोडण्याच्या मार्गावर असल्याचेही अनेकांनी म्हटले. मात्र, या जोडप्याने यावर मौन बाळगले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, अमिताभ व जया यांनी त्यांचा प्रतीक्षा बंगला मुलगी श्वेता बच्चनला हस्तांतरित केल्यापासून बच्चन कुटुंब व सून ऐश्वर्या यांच्यात मतभेद सुरु झाले. हे सर्व मीडिया रिपोर्ट्स असले तरी सत्य काय आहे हे फक्त बच्चन कुटुंबालाच माहीत आहे.