काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यानंतर मुंबई पोलिस यंत्रणेने तपास सुरु करून दोन दिवसांतच गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला. विकी गुप्ता व सागर पाल अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नाव होती. या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती. अशातच या प्रकरणी नुकतीच एक नवीन बातमी समोर आली आहे. पनवेल पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई ग्रुपच्या सदस्यांनी सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचे तपशील दिले आहेत. गेल्या आठवड्यात पनवेल दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या ३५० पानांच्या आरोपपत्रात सलमान खानला मारण्याच्या कटाबद्दलची सर्व माहिती उघड झाली आहे.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किंवा सलमान खान त्याच्या पनवेल फार्महाऊसमधून बाहेर पडताना त्याच्यावर हल्ला करण्याचा प्लॅन होता, असे त्यात म्हटले आहे. ‘TOI’मधील एका वृत्ताप्रमाणे, सलमान खानला पाकिस्तानमधून अत्याधुनिक शस्त्रे वापरुन मारण्याची योजना उघड झाली आहे. ज्यात मोबाईल फोन, व्हॉट्सॲप ग्रुप बनवणे, टॉवर लोकेशन आणि ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचची तांत्रिक तपासणी समाविष्ट आहे.
आरोपपत्रात धनंजय तापसिंग उर्फ अजय कश्यप, गौतम विनोद भाटिया, वास्पी महमूद खान उर्फ चेना, रिजवान हसन उर्फ जावेद खान आणि दीपक हवासिंग उर्फ जॉन वाल्मिकी यांच्यासह बिश्नोई टोळीतील आणखी पाच सदस्यांची नावे आहेत. पनवेलचे पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना सलमान खानवर नियोजित हल्ल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला तपास सुरु झाला.
आणखी वाचा – त्रिनयना देवीने नेत्राच्या ओटीत दिलेल्या वस्त्राचं नेमकं रहस्य काय? देवी आई लेकींना नवीन मार्ग दाखवणार का?
या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या टोळीतील सदस्यांना २५ लाखांचे कंत्राट दिल्याचे उघड झाले आहे. या टोळीने १५-१६ जणांशी एका व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे संपर्क साधला होता, ज्यात बिश्नोईचा कॅनडामध्ये असलेला चुलत भाऊ अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार, अजय कश्यप, विनोद भाटिया, वास्पी मेहमूद खान उर्फ चायना आणि रिझवान हसन खान यांचा समावेश होता. पाकिस्तानातील सुखा शूटर आणि डॉगर यांच्याकडे AK-47, M16 किंवा M5 सारखी शस्त्रांची पोलिसांनी ओळख पटवली आहे.