Vaishnavi Hagawane Death : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आता वेगळंच वळण घेताना दिसत आहे. सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून वैष्णवीने वयाच्या २३ व्या वर्षी गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूला तिच्या सासरच्या मंडळींना जबाबदार धरले. पती शशांक हगवणे, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना सर्वप्रथम अथक कऱण्यात आली. यावेळी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांनी पळ काढला, मात्र वैष्णवीच्या मृत्यूच्या सात दिवसांतच त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. वैष्णवी हगवणे प्रकरणात आणखी एका व्यक्तीच नाव आलं. मात्र ती व्यक्तीही पसार असल्याचं निदर्शनास आलं. ही व्यक्ती म्हणजेच निलेश चव्हाण.
शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात निलेश अनेकदा सहभागी असायचा. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे नऊ महिन्यांचे बाळ हे निलेशकडे होते. ही महत्त्वाची माहिती जेव्हा तिच्या माहेरच्यांना कळली तेव्हा २० मे रोजी वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता, निलेशने त्यांना पिस्तुल दाखवून घाबरवले आणि घराबाहेर हाकलून लावले. तसेच बाळाचा ताबा देण्यासही त्याने स्पष्ट नकार दिला होता. यानंतर कस्पटे कुटुंबीयांच्या (वैष्णवीच्या माहेरच्यांच्या) तक्रारीवरून निलेश चव्हाण याच्याविरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याच्या आणि पिस्तुलाचा धाक दाखवत दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.
कालांतराने, एका सराईत व्यक्तीमार्फत निलेश चव्हाणने वैष्णवीच्या बाळाला कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्त केले आणि स्वतः मात्र फरार झाला. वैष्णवीची सासू आणि नणंद यांचे फोनही निलेशच्या ताब्यात असल्याचं समोर आलं. वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा तो मित्र असल्याची माहिती आहे. या सगळ्या प्रकरणात आपण अडकले जाऊ म्हणून निलेशने पळ काढला. मात्र, काल नेपाळ बॉर्डरवर निलेशला पकडण्यात यश आले.
नीलेश चव्हाण गेले १० दिवस फरार होता. सुरुवातीला तो पुण्यातून रायगड येथे गेला. तेथून दिल्लीला गेला. त्यानंतर दिल्ली, गोरखपूरमार्गे सौनौली, भैरहवमार्गे नेपाळ सीमेवरील काठमांडू असा प्रवास करत तो नेपाळमध्ये गेला. त्यानंतर तो भैरहव येथून उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील सौनौली येथे आला. त्याची माहिती मागावर असलेल्य पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आता निलेशच्या उत्तरांनी वैष्णवी प्रकरण कोणतं वेगळं असं वळण घेणार हे पाहणं रंजक ठरेल.