मराठी मालिकाविश्वातील आघाडीचा अभिनेता शशांक केतकर हा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांविषयी भाष्य करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने फिल्मीसिटी बाहेरील अस्वच्छतेबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्याने यावर भाष्य केले होते. त्यानंतर महापालिकेने तात्काळ कारवाई करत फिल्मीसिटी बाहेरील कचरा उचलला होता. अशातच शशांकने रविवारी मालाडच्या मालवणीमधील अस्वच्छतेबाबतही आवाज उठवला. शशांकने रविवार (२० ऑक्टोबर) रोजी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत मालाड पश्चिम, मालवणीमधील कचऱ्याची तक्रार महानगरपालिकेकडे केली होती. (Shashank Ketkar On Garbage)
याद्वारे त्याने सरकार आणि स्थानिक यंत्रणेला थेट सवालही उपस्थित केला होता. यावेळी शशांकने असं म्हटलं होतं की, “मी माझ्याकडून प्रामाणिक प्रयत्न करत असून अशा परिस्थितीबद्दल भाष्य करत आहे. माझ्यातील आशा अजूनही जीवंत आहे. त्यामुळे मी महानगरपालिकेच्या नजरेस आणून देत आहे आणि मी हा कचरा साफ होईपर्यंत माझ्या इन्स्टाग्रामवर याचे फोटो पोस्ट करेन”. शशांकच्या या कचऱ्याच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने याकडे लक्ष देत योग्य ती कार्यवाही केली आहे. शशांकने आधी शेअर केलेल्या कचरापेटीबाहेर आता कचरा साफ झाला असून यानिमित्ताने त्याने महानगरपालिकेचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा – 22 october Horoscope : मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात मिळणार यश, आर्थिक भरभराटीचे आहेत संकेत, जाणून घ्या…
शशांकने तक्रार केलेल्या ठिकाणी स्वच्छता बघून तिथला व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “मला महानगरपालिकेचे आभार मानायचे आहेत आणि त्यांचं अभिनंदन करायचं आहे. मी व्हिडीओ टाकल्यानंतर लगेच कार्यवाही केली. आत इथे अजिबात कचरा दिसत नाहीये. या गोमाता रोजच्या सवयीप्रमाणे इथे येऊन बसल्या आहेत. कदाचित लोकांनी कचरा टाकला नसेल किंवा महानगरपालिकेच्या बांधवांनी तो कचरा लगेचच उचलला असेल. त्यामुळे आता रस्त्यावर कचरा नाही. परिसर स्वच्छ दिसत असून हे खूप कौतुकास्पद आहे”.
आणखी वाचा – ‘पाऊस’ वेबसीरिजचा बोलबाला, प्रत्येक एपिसोडला भरभरुन प्रतिसाद, प्रेक्षकांची विशेष पसंती
याऔद्धे त्याने “हीच स्वच्छता कायम राहावी ही आपल्या नागरिकांना आणि महानगरपालिकेला माझी विनंती आहे”. असं आवाहनही केलं आहे. दरम्यान, या व्हिडीओखाली अनेकांनी त्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे. “तुझ्या व्हिडीओमुळे किती फरक पडतो”, “चुकीची जाणीव करुन दिल्याशिवाय प्रशासन आणि जनतेला जाग येत नाही”, “शशांक खरंच तू ग्रेट आहेस”, “खूपच छान तुझा अभिमान वाटतो” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी शशांकचे कौतुक केले आहे.