प्रत्येक कलाकाराचे चाहते हे असतातच आणि या चाहत्यांचे आवडत्या कलाकाराविषयीचे काहीना काही किस्सेदेखील असतात. हे किस्से कधी गंमतीशीर असतात, मात्र कधी मन सुन्न करणारे असतात. त्यातही कवी, गीतकार यांच्या वाटेला त्यांच्या चाहत्यांच्या अशा किस्स्यांची रास ही अधिकच असते. असाच एक मन सुन्न करणारा प्रसंग सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्याबद्दलचा आहे.
“आयुष्यावर बोलू काही…” या काव्य-सुरांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सलील-संदीप हे अनेक ठिकाणी प्रवास करत असतात. या प्रवासात त्यांना त्यांच्या कवितांचे किस्से सांगणारे अनेकजण भेटत असतात. असंच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संदीप यांना त्यांच्या एका चाहत्याने त्यांच्या ‘नसतेस घरी तू जेव्हा’ या गाण्याविषयीच्या आठवणीचा प्रसंग सांगितला आणि हा प्रसंग ऐकून तेदेखील सुन्न झाले. ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत संदीप यांनी हा प्रसंग सांगितला आहे.
यावेळी ते असं म्हणाले की, “कधी कधी सुन्न करणारा प्रसंगही येतो. एकदा एका कार्यक्रमाचे आयोजक आम्हाला न्यायला आले होते. तेव्हा त्यांनी गाडीत ‘नसतेस घरी तू जेव्हा’ हे गाणं लावलं. तर आता आम्हाला याची सवय झाली आहे की, म्हणजे आम्ही असे कार्यक्रमाला वगैरे जात असताना ते ज्या कलाकाराचा कार्यक्रम असेल त्याचीच कॅसेट किंवा गाणी लावतात आणि आमच्या कारमध्ये कायम हेच वाजतं वगैरे बोलतात. काही अपवाद सोडले तर बऱ्यापैकी सगळेचजण अनेकदा मुद्दाम वागतात. तर आम्हालाही हे मुद्दाम करणाऱ्यांसारखे वाटले. तर आम्ही त्यांना म्हटलं की अहो हे गाणं बंद करा. कारण आता जाऊन हेच गायचं आहे.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, अमाही त्याला गाणं बंद करायला सांगताच तो “नाही राहुदेत ना. मला हे एक गाणं तुमच्याबरोबर ऐकायचं आहे” असं म्हणाला आणि मग हे त्याने सांगितलं की, “हे गाणं मला अशासाठी ऐकायचं आहे की, गेल्या वर्षी मी आणि माझ्या बायकोने पळून जाऊन लग्न केलं. दोघांच्याही घरातून विरोध होता. त्यामुळे दोन्ही घराची दारं आमच्यासाठी बंद झाली आणि लग्न झाल्यानंतर ६ महिन्यांनी ती कॅन्सरमुळे गेली.” आणि त्याचं हे ऐकून ते गाणं माझ्याचं अंगावर आलं की त्याला या परिस्थितीत हे गाणं ऐकून काय वाटत असेल.”