आजकाल रस्त्यांची दुरावस्था आणि ट्रॅफिक पाहता कलाकार मंडळीही ट्रेनने प्रवास करु लागले आहेत. अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांचा ट्रेन प्रवासाचा अनुभव चाहत्यांसह शेअर करतात. हल्ली मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवा सुरु झाल्याने बरेच कलाकार त्याच्या वेळेची बचत करण्यासाठी या सेवांचा वापर करतात. मात्र यादरम्यानही अनेकदा त्यांना वाईट अनुभव आलेले आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने ट्रेन प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवावर भाष्य करत आपलं मत मांडलं आहे. ट्रेन वेळेत नसताना अभिनेत्रीला मनस्ताप सहन करावा लागला असल्याने तिने राग व्यक्त केला आहे. (Akshata Apte Angry On Ac Train)
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षता आपटे हिने यावरुन भाष्य करत राग व्यक्त केला आहे. एसी लोकल वेळेत येत नसल्याने तिकिटाचे पैसे कसे वाया जातात या मुद्द्यावर तिने भाष्य केलं आहे. या प्रकरणावर खरमरीत पोस्ट शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “मध्य रेल्वेवर AC trains एकतर वेळेवर तरी याव्यात, नाहीतर ट्रेनमध्ये चढल्यावर TC ने तिकीट नसेल तर. दंड न घेता प्रवाशांकडे असलेलं साधं किंवा First Class चं तिकीट तिथल्या तिथे upgrade करून द्यावं. AC train पकडण्याच्या तयारीत AC चं तिकीट काढलं तर ट्रेन येता येत नाही, वाट बघण्यात वेळ वाया जातो आणि शेवटी साधीच गाडी पकडून यावं लागतं, AC ट्रेनच्या तिकिटाचे पैसे वाया जातात आणि ‘जाऊदे आता AC train कधीच निघून गेली असेल’ असं म्हणून साधं किंवा even First Class च तिकीट असेल तर नेमकी (भयंकर late असलेली) AC train तेव्हा येणार”.
पुढे ती म्हणाली, “घाईघाईत तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट काढून येण्याइतपत वेळ नसतो, आणि प्रत्येक स्थानकावर ATVM मशीन सुद्धा नसतात अशावेळी त्या ट्रेनमध्ये चढून TC फक्त १५/- चा फरक असला तरीही दंड आकारणार. म्हणजे तेही पैसे आपली काही चूक नसताना जावेत. असा गोंधळ माझ्या बाबतीत अनेकदा झाला आहे. म्हणजे मी First Class चं तिकीट असताना शिस्तीत दंड सुद्धा भरला आहे आणि अचानक indicator वर unexpectedly AC train दिसल्यावर दादरला ८ नं. वरुन धावत वर जाऊन main window वर जाऊन तिकीट काढून येईपर्यंत train गेली आहे. या दोन्ही cases मध्ये AC train भयंकर उशिरा होती आणि मला खरंच कुठेतरी पोहोचण्याची घाई होती. पैसे वायाच दोन्हीकडे. यात चूक कोणाची?”, असा सवाल तिने केला आहे.
आणखी वाचा – ‘हा’ स्पर्धक ठरणार ‘बिग बॉस ओटीटी ३’चा विजेता, अरमान मलिकचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
“वाहतूक कोंडी कमी व्हावी, प्रवासाचा वेळ वाचावा आणि थोडा आरामदायी प्रवास व्हावा म्हणून चालू केल्या आहेत ना AC ट्रेन्स? त्यासाठी प्रामाणिकपणे तिकीटाचे एवढे पैसे खर्च केल्यावर इतक्या rare trains इतक्या बेभरवशाच्या वेळेत आल्या तर कसं चालेल?? उलट त्या तर top priority असल्या पाहिजेत ना. काय वाटतं? आणि M-indicator सुद्धा अशावेळी नेमकं कसं माती खातं के कळत नाही”.