‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘अस्सं संसार सुरेख बाई’, ‘हे मन बावरे’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरांत पोहोचली. या मालिकांमधून मृणालने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक हा चेहरा आहे. करिअरच्या शिखरावर असताना मृणालने लग्नगाठ बांधली. मृणालने परदेशात कामानिमित्त असणाऱ्या नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. आणि लग्नाच्या काही वर्षांनंतर ती नवऱ्याबरोबर परदेशात स्थायिक झाली. (Mrunal Dusanis On Husband)
अखेर चार वर्षांनंतर मृणाल अमेरिकेतून भारतात परतली आहे. मृणाल बऱ्याच मुलाखतींद्वारे तिच्या प्रेक्षकांना तिच्याबद्दल सांगताना दिसत आहे. नुकतीच मृणालने सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने तिच्या नवऱ्याच्या स्वभावाबाबत व लेकीबद्दलही बरंच भाष्य केलं. मृणालने यावेळी तिच्या नवऱ्याची खटकणारी गोष्ट कोणती याबाबत खुलासा केला.
मृणाल म्हणाली, “निरजमधील जी गोष्ट मला आवडली ती म्हणजे तो खूप मोकळीक देतो. स्पेस देतो. तो माझ्या मतांचा आदर करतो. सन्मान करतो. आणि सन्मान ही गोष्ट आम्हा दोघांना महत्वाची वाटते. तसं त्याच्यात वाईट म्हणण्यासारखं काहीच नाही आहे. पण हे आहे की तो खूप काळजी घेतो. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की, हे मला जमेल. मी हे करू शकते. मी १० – १२ वर्ष एकटी मुंबईत राहिली आहे. एकटी फिरली आहे. मी इथून इथे एकटी प्रवास करु शकते. अशावेळी तो खूप काळजी घेतो आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो, मग मला कधी कधी वाटतं की, हे माझे वडील पण करत होते तर तू थोडासा थांब”.
पुढे ती म्हणाली, “काळजीपोटी तो बऱ्याच गोष्टी करतो. पण मला त्याचं ते थोडंसं खटकतं. पण मला त्याचं आश्चर्यही वाटतं की, तो खूप शांत आहे. प्रत्येक गोष्टीवर तो शांतपणे आणि विचार करुन उत्तर देतो. मी तशी नाही आहे. मला पटकन राग येतो. पण त्याचं तसं नाही आहे. मी त्याला चिडताना सहसा पाहिलं नाही. तो खूप पेशन्स असलेला व्यक्ती आहे. त्याचं मला खूप कौतुक वाटतं”.