Mandana Karimi on leaving India : सध्या मध्यपूर्वेतील देशांतील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांची हत्या झाली, त्यावर अभिनेत्री मंदाना करीमी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आनंद व्यक्त केला. पण आता मंदानाने असे काही बोलून दाखवले आहे ज्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंदाना करीमीने अलीकडेच एका मीडिया मुलाखतीदरम्यान भारत सोडण्याबाबत भाष्य केले आहे आणि तिच्या घरी इराणला परतण्याची इच्छा व्यक्त केली.
मंदाना करीमी यांचे वादग्रस्त विधान
‘भाग जॉनी’ चित्रपट फेम अभिनेत्री मंदाना करीमीने अलीकडेच ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी इराण आणि भारताबाबत खुलेपणाने भाष्य केले आहे. मंदाना म्हणाली, “सुरक्षेच्या कारणास्तव मी भारत सोडत आहे. माझ्यासाठी हे खूप अवघड आहे, मी खूप लहान वयात इथे आले आणि आता इथून निघण्याचा विचार करत आहे. भारताने माझा विश्वासघात केला असून गेल्या दोन महिन्यांपासून मला खूप एकटे वाटत आहे. याचे कारण मी इराणबद्दल उघडपणे बोलले. यामुळे मी माझे अनेक मित्र गमावले, त्यांनी स्वतःला माझ्यापासून दूर केले”.
ती पुढे म्हणाली, “या देशाने मला अभिनय आणि मॉडेलिंगसारख्या क्षेत्रात अनेक संधी दिल्या आहेत, ज्यासाठी मी सदैव ऋणी राहीन. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये दुसऱ्याला सत्तेवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतंत्र इराणचे स्वप्न मी खूप दिवसांपासून पाहत होते. जिथे महिलांना पूर्ण स्वातंत्र्य मिळेल, तिथे त्या कॉलेजमध्ये शिकू शकतात आणि हवे ते कपडे घालू शकतात. शक्य तितक्या लवकर मी इराणला परत जाईन. मी माझ्या बॅगा भरल्या आहेत आणि सर्व तयारी पूर्ण झाली आहे”. इतकेच नाही तर मंदाना यांनी खमेनी यांच्या इराणच्या राजवटीला कर्करोग असे संबोधले आहे.





