हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज व दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल नाना पाटेकर यांनी धक्कादायक दावा केला आहे. वास्तविक, १९९५ मध्ये ‘हम दोनो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नाना पाटेकर व ऋषी कपूर यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटादरम्यान घडलेल्या गोष्टींची आठवण करुन देताना नाना पाटेकर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, ऋषी मोठ्या कष्टाने एकापेक्षा जास्त टेक देण्यास सहमत होते. इतकंच नाही तर ऋषी कपूर सेटवर शिवीगाळ करायचे असेही नाना पाटेकर म्हणाले. (Nana Patekar On Rishi Kapoor)
‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूरबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले, “तो खूप शिवीगाळ करत असे”. यानंतर जेव्हा नानांना विचारले की, ऋषी कपूर जास्त शिव्या देतात का?. यावर नाना म्हणाले, “अरे. त्याला खूप राग यायचा. तो एकच टेक द्यायचा, त्यापेक्षा जास्त नाही. तो म्हणायचा, आम्ही एक्सटेम्पोर आहोत. तुम्हा रंगभूमीच्या लोकांसारखे नाही आहोत”, असं त्याचं म्हणणं असायचं.
नाना पाटेकर यांनी सांगितले की, जेव्हाही ऋषींना दुसऱ्या टेकबद्दल विचारले जाते तेव्हा त्यांचा संयम सुटतो. नाना म्हणाले, “मी एकदा त्याला दुसरा शॉट देण्यास सांगितले कारण पहिला शॉट खूपच खराब होता. ते म्हणाले, ‘येथे दिग्दर्शक कोण आहे? शफी की तू? याला बाजूला करा. त्याने मोठ्या कष्टाने दुसरा टेक दिला. आणि ‘चिंटू, हा मूर्खपणा आहे, असं तो बोलला. त्यांनतर त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. खूप घाणेरड्या शिव्या दिल्या. पाचव्या टेकपर्यंत येईपर्यंत वैतागून ते म्हणाले आता मी तुला मारेन हा. चित्रपटात दाखवण्यात आलेला हा सीन पाचवा टेक होता. डबिंगसाठी आल्यावर मी त्यांना म्हणालो की, बघा, मी पाचवा शॉट ठेवला आहे, तो (रागाने) म्हणाला, हो. ठीक आहे यार. जेव्हा ते उपचारासाठी गेले होते तेव्हासुद्धा आम्ही खूप बोललो”.
२०१८ साली ऋषी कपूर यांना ल्युकेमिया झाल्याचे निदान झाले होते आणि ते उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले आणि २०२० मध्ये त्यांचे निधन झाले.