Deepali Sayed On Vaishnavi Hagawane : सर्वत्र वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने खळबळ माजली आहे. वैष्णवी हगवणेने सासरच्या जाचाला कंटाळून वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी आत्म्हत्येसारखं मोठं पाऊल उचललं. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे आरोपी म्हणजेच संपूर्ण हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. वैष्णवीला न्याय मिळायला हवा म्हणून सगळेच जण आवाज उठवताना दिसत आहेत. दरम्यान, हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका घेतली. यामुळे अनेकांनी वकिलांच्या विरोधात भाष्य केलं. वैष्णवीच्या पाठिंब्यात अनेक कलाकार मंडळींनीही भाष्य करत आपलं मत मांडलं. अशातच अभिनेत्री दीपाली सय्यद यांनीही या वैष्णवी प्रकरणावरुन आवाज उठवला आहे. हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीचं बाहेर अफेअर आहे असं सांगणं चुक असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
दीपाली सय्यद यांचा माध्यमांशी संपर्क झाला तेव्हा वैष्णवी प्रकरणावर त्या स्पष्टच बोलल्या. दीपाली सय्यद या राजकारणातही सक्रिय आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी या चर्चेत असलेल्या प्रकरणाबाबत आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या, “वैष्णवीच्या बाळाला बघितलं, तिचा प्रश्न काढला, तरी मला गलबलून येतं. राजकारण बाजूला ठेवा आणि आता वैष्णवी हगवणे हिला न्याय मिळणे महत्त्वाचं आहे. वैष्णवीला न्याय मिळाला नाहीतर पुढे अनेक वैष्णवी निर्माण होतील. मी माझ्या येणाऱ्या चित्रपटात महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्या खुर्चीवर बसून कशाप्रकारे न्याय दिला पाहिजे, हे माझ्या लक्षात आलं. पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे चुकीला माफी नाही. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात माझ्या नावाच्या पाटीला ब्लर करायला लावलं. सिनेमात महिला आयोगाची अध्यक्ष होणे म्हणून चुकीचे आहे का? असा सवाल दीपाली सय्यद यांनी विचारला. पंतप्रधान, मुख्यमंत्री, डॉक्टर असे अनेक रोल आम्ही बजावतो”, असेही त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, “हगवणे प्रकरणात महिला आयोगासह प्रत्येकाचे रोल महत्त्वाचे आहेत. प्रत्येकजण चुकू शकत नाही. सगळ्यांनी एकत्रित बसून वैष्णवीला न्याय द्यायला हवा या प्रकरणात हगवणेच्या वकिलाकडून देखील चूक झाली आहे. एक पोर गेलं आहे. एक आई आपल्या मुलाला सोडून आत्महत्या करतेय. मरणाच्या आधी तिच्या अंगावर २९ घाव आहेत असं असताना तुम्ही सांगता चूक नाही, मारणं हे चूक नाही. कुठेतरी वैष्णवीचं बाहेर अफेअर होतं म्हणे. अरे ती गेली आहे. कुठेही काही प्रूफ नसताना तुम्ही कसं काय सांगू शकता?”.
या प्रकरणावरुन संताप व्यक्त करत त्या पुढे म्हणाल्या आहेत की, “तिला न्याय मिळाला नाहीतर १० हजार वैष्णवी तयार होतील. आता बस. एका मुलीच्या लग्नाला तीन वर्ष होतात, ती बाळाला जन्म देते, आत्महत्या करते, या सगळ्याचा शेवट काय तर ती घाणेरडी. तिचं अफेअर होतं का? पुरुष मंडळी अफेअर करत नाहीत का? ती गेल्यावर तिला नावं का ठेवता?. मला वैष्णवीच्या आई-वडिलांना भेटायचं आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा मुलीला त्रास होतो, तेव्हा ती आई वडिलांना बोलली असेल ना, त्यावेळी का नाही गोष्टी ऐकल्या? आपल्या मुलीला त्रास होतोय, म्हणून जर तुम्ही थांबवलं असतं, तर आज वैष्णवी गेली नसती”, असा अनेक सवाल दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केले.