अभिनेत्री स्पृहा जोशीने आजवर तिच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अनेक मराठी मालिका , चित्रपटांमधून व सूत्रसंचालनाद्वारे स्पृहा कायमच रसिक प्रेक्षकांच्या सान्निध्यात राहिली. बऱ्याच मुद्द्यांवर स्पृहा स्पष्टपणे भाष्य करतानाही दिसली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पृहाने आई होण्याच्या तिच्या निर्णयाबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. मूळ होऊ द्यायचं नाही असं तिने स्पष्टपणे ठरवलं नसल्याचंही तिने या मुलाखतीत सांगितलं. (Spruha Joshi)
नुकत्याच आरपार या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्पृहाने तिच्या वैयक्तिक जीवनाबाबत बरच भाष्य केलेलं पाहायला मिळालं. यावेळी ती आई होण्याबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना म्हणाली, “या सगळ्या गोष्टी फार वैयक्तिक असल्याने यात काय चूक काय बरोबर? याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. माझ्या अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्यांना मूल हवं होतं आणि बाळ झाल्यानंतरही आज त्यांचं करिअर अगदी उत्तम सुरु आहे. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण घ्यायचं झालं, तर गिरीजा ओक, आरती यांनी बाळ झाल्यावर इंडस्ट्रीत पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केली. काहींचे विचार याच्या उलट असतात. माझ्या बाबतीत असं झालं की, मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कामच करत होते. काम उत्तम सुरु असताना मध्ये ब्रेक घेऊया असं मला व वरदला जाणवलं नाही”.
स्पृहा पुढे म्हणाली, “बाळाचा निर्णय हा आमचा एकत्र ठरवून घेतलेला निर्णय आहे. सध्याच्या काळात प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा आहे. माझा जन्म झाला तेव्हा माझी आई २३ वर्षांची होती. पण, याउलट मी २३ वर्षांची असताना रोज १२-१२ तास शूट करत होते. त्यामुळे तेव्हा काम थांबवावं असं मला नाही वाटलं आणि आताही ब्रेक घ्यावा असं मला नाही वाटत. बरं मूल झाल्यावर परत दोन वर्षांचा ब्रेक असेल, पुढे काम मिळेल की नाही असाही कोणताच विचार यामागे नाही”.
पुढे ती असंही म्हणाली की, “नशीबाने मला दोन्ही कुटुंबाकडून उत्तम साथ मिळाली आहे. माझं माहेरच्या व सासरच्यांनी आम्हा दोघांनाही याबाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आम्ही दोघंही करिअरच्या ज्या टप्प्यावर आहोत, तिथे लगेच कोणताही निर्णय घेणं तेवढं सोपं नाही. आमचं असंही काहीच नाही की, कधीच मूल नको आहे. अलीकडच्या काळात सगळ्या गोष्टी वैज्ञानिक व आरोग्याच्या दृष्टीने पूर्वीपेक्षा फार पुढे गेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे आता एक चॉइस आहे जो काही वर्षांपूर्वी बायकांकडे नव्हता. त्यामुळेच ठराविक वयात ठराविक गोष्टी झालेल्या बऱ्या असं म्हटलं जायचं. पण, आता गोष्टी बदलल्या आहेत” असं म्हणत तिने तिच्या खासगी जीवनाबाबत भाष्य केलं.