‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने अनेक काळापासून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. यानंतर आता मालिकेतील कथानकाचा काळ तब्बल २५ वर्ष पुढे सरकणार आहे. या सगळ्यात मालिकेतील काही जुनी पात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. तर दुसरीकडे काही नवी पात्र मालिकेत दिसणार आहेत. या जुन्या पात्रांचा संपलेल्या प्रवासाबाबत अनेक कलाकार भावुक झाले आणि त्यांनी भावुक होत सोशल मीडियावरून पोस्टही शेअर केल्या. (Kapil Honrao New Entry)
यांत मल्हार ही भूमिका साकारलेला अभिनेता कपिल होनराव याच्या पात्रावरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता मात्र मालिकेतून कपिलची मल्हार ही भूमिका निरोप घेत असल्याचं समोर आलं आहे. अशातच एक स्पेशल पोस्ट शेअर करत कपिल सोशल मीडियावरून व्यक्त झाला असल्याचं पाहायला मिळालं आहे. कपिलने सेटवरील काही फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “नऊशेच्यावर एपीसोड, साडे तीन वर्षांचा प्रवास काल थांबला. सुख अजुन काय असतं, या मालिकेने जे सुख मला दिलं आहे ते मी शब्दांत माडू शकणारं नाही.
यापुढे बोलत कपिल म्हणाला, “नाव, ओळख, प्रसिद्धी, यश सगळं सगळं या एका मल्हारने कपिलला दिलं आहे. मल्हार असा इतका साधा माणुस असतो हेच सुरवातीला मला पटत नसे पण हळू हळू त्याचा समजूतदारपणा, त्याचं साधेपण, सगळ्यांवर कशाची ही अपेक्षा न ठेवता प्रेम करणं, कमी बोलणं हे नंतर स्क्रीनवर करता करता आवडू लागलं. मल्हार जरी आत्ता नसला तरी त्याचे हे सगळे चांगले गुण कायम आता माझ्याबरोबर असतील”.
“तुम्ही प्रेक्षकांनी मला जे भर भरुन प्रेम दिलं आहे त्याचा मी कायम ऋणी असेल. तुमचे लाख लाख आभार. असंच तुमच प्रेम कायम असू द्या. मला ही संधी दिली त्याबद्दल स्टार प्रवाहचे खूप आभार. कोठारे व्हिजनचे खूप आभार. भेटू लवकरचं नवीन रुपात नवीन वेषात”. असं म्हणत लवकरच तो नव्या भूमिकेतून समोर येणार असल्याचं त्याच्या या पोस्टवरून समोर आलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याला मिस करत असल्याचं म्हटलं आहे. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “पैलवान लवकर नवीन भुमिकेत या वाट पाहतोय. कोणतीही भुमिका करा आमच्यासाठी मल्हारचं राहणार”. यावरून चाहते कपिलच्या मल्हार या भूमिकेला मिस करत असल्याचं समोर आलं आहे.